मी एकटाच, माझ्या उरल्या न आशा काही
संपले मार्ग हे सारे, निस्तेज दाही दिशाही ।
तो सुर्यही निघाला मावळतीच्या दिशेला
अन माझिया मनाची सर्व आस आज अस्ताला ।
अन चंद्रही निघाला ढगढगांच्या कुशीत
बोचरी निशा ही सारी भेसुर कोल्हेकुईत ।
ते काळजात माझ्या वाजे मध्यान्हीचे ठोके
अंधार चाचपडे पण आयुष्य ओकेबोके ।
प्रहर शेवटचा वाटे होणार का आज अंत
क्षणैक वाटले की हे हृदय झाले संथ ।।
कानावर पण दुरुनी आली भुपाळीची ओवी
प्रहर शेवटून जशी ती चाहूल प्रभातीची यावी ।
किलबिलाट आसमंतात पक्षांचा सारा घुमला
कालचा दिनकर तो आज इकडुनी उगवला ।
फेकूनी मरगळ सारी हे तन निश्चयी झाले
कालची निशा ती सरली मार्ग ते दृष्टीस आले ।
म्हणे मग मी स्वतःशी कोण मीच तो वेडा?
माझ्याच अडचणींचा मलाच वाचतो मी पाढा?
आले हसु मला ते माझ्याच त्या स्थितीचे
अन आज उमगले ते भावविश्व माझ्या मनाचे ।
झोकूनी दिली ती सारी लक्तरे पांघरुणांची
घेतली नशा पहाटेच अनभिषक्त निसर्गाची ।
उर भरुन भरला मी तो श्वास गार थंडगार
रोमरोमांत शिरला तो श्वास सोडता हळुवार ।
मग मनात आले की हा आणखी नवा दिवस
कसा जागवी मला तो लावे जगण्याची ही आस ।
मग एकटा कसा मी हा भास्कर सोबतीला
अदम्य उत्साहाचा लाल सागर पुर्व दिशेला ।
ठळकल्या सर्व त्या वाटा महामार्ग मला ते दिसले
द्रुतगतीत सारे माझ्या मनात परी ते ठसले ।
तनावरुन फिरल्या माझ्या गार जलाच्या या धारा
स्नान करता धुपल्या मळभाच्या रेषा साऱ्या ।
तन-मनात भरली स्फुर्ती रिचविता चहाचा पेला
भरभरला उदरामध्ये मार्ग सर्व जागवित गेला ।
एक एक वस्त्रे चढली तनावर लेवूनी सारी
जशी स्फुर्ती, उत्साह लेवून घेतली मनाने भरारी ।
कुंतल ते वळले सारे मग आपसूक हवे तसे
दर्पणही सोबतीला की ठाकठीक सर्व ते असे ।
मारली उडी मग मीही प्रत्यायास रोजनिशीचा
सुरु प्रवास सारा माझा की माझ्या वेड्या मनाचा…??